निकृष्ट जेवणावरील उत्तरेही मिळमिळीत
- सकाळ वृत्तसेवा
Monday, August 27, 2012 AT 12:22 AM (IST)
रिफेक्टरीत विद्यार्थी जेवण करीत असताना त्यांच्या भाजीत शनिवारी अळ्या आढळल्या होत्या. हा प्रकार रिफेक्टरी समिती अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना अपशब्द वापरत हाकलून दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकला असून, "जेवण बंद' आंदोलन सुरू केले आहे. रविवारी रिफेक्टरी एकवेळ सुरू असते. मात्र, तेथे आज एकही विद्यार्थी फिरकला नाही. त्यामुळे रिफेक्टरीत शुकशुकाट होता.
""विद्यापीठात विविध समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते. त्याची दखल घेतली जात नाही. निकृष्ट जेवणाची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ढिसाळ कारभारामुळेच जेवणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत गेला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे विद्यापीठाचे काम आहे.'' ""अडचणीबाबत तक्रार करण्यासाठी गेल्यास अधिकारी हाकलून देतात. "तुला काही समजते का? शिक्षण सोडून तुला हे धंदे सुचतात का?' अशा शब्दात खडसावतात. आम्ही अडचणी सांगायच्या कुणाला,'' असा प्रश्न एका विद्यार्थ्याने उपस्थित केला. निकृष्ट जेवणामुळे हॉटेलमध्ये जावे लागते. त्याचा खर्च पेलवत नसल्यामुळे अर्धवेळ काम करावे लागत आहे. जेवण चांगले मिळाले, तर अभ्यासाकडे अधिक लक्ष देता येईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
