Friday, 18 January 2013

आंतरजातीय-धर्मीय प्रेमविवाह विषयीच माझ मत.....


    मा. प्रा.डॉ .ई.व्ही.चिटणीस सरांनी सांगितलेल्या गोष्टीवर माझे असे मत आहे कि, त्या मुलीने जे केले ते योग्य आहे. ती ज्या समाजातून ज्या प्रदेशातून आहे, ज्याप्रकारे तिने मेहनतीने शिक्षण घेतलं, उच्चशिक्षित झाली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. मोठ्या पगाराची नोकरी आहे. दुसऱ्या धर्माचा पती करून एक मुल दत्तक घेतलं. हे सर्व निर्णय तिने स्वतःच्या विवेक बुद्धीने, विचाराने घेतलेत तर यात वावगं काय ? तिच्या या निर्णयाने जर कोणाचे वाईट न होता जर काही चांगले होत असेल तर ते कौतुकास्पद आहे. तीने तिच्या कुटुंबाची, समाजाची योग्य रीतीने काळजी घ्यावी. त्यांना वेळोवेळी चांगली मदत, सहकार्य करावे, त्यांना प्रेम द्यावं. बस अजून बाकी काही जास्त अपेक्षित नाही. मग तीने धर्माबाहेर जाऊन लग्न करून इतरांना जो संदेश दिला जाईल तो समाजाच्या हिताचा आहे. मग आम्हाला व आमच्या काही धर्मांध राजकीय नेत्यांना ( अक्बरुद्दिन ओवेसी सारख्या ) निवडणुकीसाठीचे विषय हे विकासकामेच राहतील. त्यांना धर्माच्या नावावर लोकांना भडकवता येणार नाही. अश्या इतर चांगल्या घटना फक्त अश्या तिच्या सारख्या निर्णयांमुळे होतील. प्रत्येकाने तिच्यासारखी आपल्या विचारांची पार्श्वभूमी, आपला जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा. निरोगी समाज होण्यासाठी अश्या विचारांची आणि आचरणाची गरज आहे . अश्यानेच चांगल्या समाजाचे स्वास्थ टिकून राहू शकते.
        काल दिनांक १८ जानेवारी २०१३ रोजी माझ्या मोठ्या चुलतभावाचा प्रेमविवाह झाला . सर्व जण अचानक होणाऱ्या या लग्नाला उपस्थित तर होतेच, त्या नवविवाहित जोडप्याला ( मनोभावे )शुभेच्छाहि दिल्या, पण त्याचबरोबर ते स्वतःच काहीश्या संभ्रमातहि होते, संभ्रम असा कि आपण उपस्थित आहोत ते लग्न तर आंतरजातीय आहेच, जातीचा प्रचंड ( नसलेला ) अभिमान आहे, पण त्याच जातीतल्या व्यक्तीशी आपले नाते तर चांगले आहे.म्हणून तर लग्नाला आलो.मग नंतर त्या विवाहाची विवाहमंडपात किंवा बाहेर त्याची नको असलेली चौकशी किंवा निंदा करायची,नको असणारे बिनबुडाचे प्रश्न करायचे, जातीचे खोटे दाखले द्यायचे.
       एकीकडे त्या पांडुरंगाची वारी करायची, वारी करत असताना सोबत कोण आहे, कुठल्या जाती-धर्माचा किंवा समाज्याचा आहे हे पाहून थोडीच आपण वारी करतो किंवा त्याच्या सोबत विश्वासाच नात जोडतो. मग जात पात का मानायची,त्या संतांचे  अभंग तर तोंडपाठ,त्यांची शिकवण तर मान्य, पण ती मात्र आमलात आणताना मात्र कुठेतरी कमीपणा का वाटून द्यायचा, हि कुठली परंपरा......
      त्याच पार्श्वभूमीवर माझ्या मनात एक काहूर माजलाय. प्रश्नांचे वादळ मनात घोंघावत आहेत. विचार खूप आहेत मनात, वाटत आपला समाज अजून त्याच मनःस्थितीत आहे. त्याच त्या जुनाट रूढी परंपरा, त्याच त्या चालीरिती......
 पुन्हा एकदा त्याच संतांची शिकवण देण्यासाठी अजून संत जन्म घ्यावेत अस वाटू द्याव का ? त्यांची अगोदरच आजन्म पुरेल एवढी विचारांची शिदोरी दिलेली इतक्यात का संपावी ? का त्याच संतांच्या विचारांच्या त्यांच्या शिकवणींच्या नावाखाली आपले बुवाबाजीचे दुकान चालवायची, जे आताचे काही भोंदू बाबा, बुवा, बापू करतात, तेच करत राहायचं??  आजकालचे बापू नाही त्या विषयांवर बोलायला आणि कामे करायला लागले आहेत. वरती आपल्यालाच चुकीच्या गोष्टींच्या उपचाराचे डोस पाजायचे...

मग आपण आपल्या विचारांची पार्श्वभूमी केंव्हा वाढवायची ? का ??

       काल केलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या  वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. त्यांच्या मते जोपर्यंत शाळेच्या दाखल्यावरून आपली जात जाणार नाही तोपर्यंत या समाजातून जात जाणार नाही..... मुळात आपण जातीची बीजे लहान मनांवरती का रुजवावी. जन्मलेल्या मुलाला काहीच माहित नसतं, आपणच त्याला शिकवतो ,सांगतो कि बाबा रे तू ह्या एका विशिष्ट जाती-धर्माचा आहेस. तू अस कर तू तस कर.मुळात आपणच आहोत या सर्व गोष्टीना जबाबदार..... शाळेत असताना प्रार्थना म्हणतो पण त्याची अंमलबजावणी मात्र आपण करत नाही. एकीकडे शाळेत सर्व धर्म समभाव हे शिक्षण द्यायचे आणि दुसरीकडे जातीयवादाला प्रोत्साहन द्यायचे हि कुठची पद्धत.  कुठेतरी वाटत कि आपण शिक्षण घेतल्याने आपल्या विचारांमध्ये फरक पडतो, पण सारे कळून सुद्धा आपल्याला वळत नाही यासारखे ते दुर्भाग्य ते काय ???



समाजातून जात जाण्यासाठी काय करावं ?

जातिव्यवस्थेविषयीची तुमची मते काय आहेत ?

आंतरजातीय विवाह किंवा आंतरजातीय प्रेमविवाह करावा का ?

तुमची लाख मोलाची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.....

Thursday, 17 January 2013

   
    भारताचा सर्वात मोठा तालवाद्य महोत्सव पुण्यात गेल्या महिन्यात पार पडला. त्यात शिवमणी याचं वादन सादर झाल. ते ऐकत असताना असं जाणवलंच नाही कि फक्त शिवमणी एकटेच वाजवत आहेत. जवळजवळ ८-१० जणांच वादन ते एकटेच करत होते. आणि त्याचबरोबर पाण्याबरोबर ज्या प्रकारे ते वादन करतात ते तर खरचं अप्रतिम होत. कुठल्याही साधनातून ताल निर्माण करण्याची कला त्यांच्या अंगी आहे. खर तर ती त्यांना मिळालेली एक दैवी शक्तीच असावी. वादनाची सुरवात  करण्यापूर्वी त्यांनी शंकराची स्तुती वादनाद्वारे केली, ते ऐकत असताना अस जाणवलं कि " शिवमणी " हे नाव त्यांना अगदी शोभतं . मी लहान असतांना दूरदर्शनवर एक मालिका लागायची ' ओम नमः शिवाय ' ह्या मालिकेच title song लागायचं, त्यात जसे शिव तांडव करतात, त्याच जे संगीत होत अगदी तसच शिवमणी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या वादनात ऐकवलं. दोन्ही ठिकाणी ' शिव ' नावाचेच तांडव आहे.

Saturday, 22 December 2012

हा अजून एक बलात्कार आहे.....



आज वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणीवर सगळया काही बलात्काराच्याच बातम्या ..... असे वाटते कि जणू काही आजच खूप मोठे बलात्कार होत आहेत.... आणि ह्या वरती तरुण तुर्क आणि म्हातारे .. त्यांचे काही विचार, मतं मांडत आहेत... काय करावे आणि काय करू नये याच्यावरतीच आमची अजूनही लढाई सुरु आहे.... सगळ्या डोक्याचाच बलात्कार झालाय...अश्यातच आज ऑफिसमधील एक प्रिंटआऊट वाचनात आली. खूप मस्त लिहिलं होत, जरा तुमच्यापर्यंतपण पोहचउ वाटलं म्हणून पहा वाचून......


सत्तर वर्षाच्या आजीला 
कोर्टाच्या पायरीवर उभी असलेली बघून 
मी तिला विचारलं 
आजी तुम्ही इथं कशा 
आजी मला म्हणाली 
बाबा,सतराव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला 
होता आज त्याचा निकाल आहे.

३२ न्यायाधीश २० वकील 
४० शिरस्तेदार बदलून गेले 

निम्मे आरोपी मरून  गेले 
बाकीचे केंव्हाच पळून गेले 

तरीही मी जिवंत आहे 
हीच एक कमाल आहे.

सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा 
आज निकाल आहे 

भगवान के घर दर है,
हि म्हण जराही बदलली नाही,
न्यायदेवतेची पट्टी जरासुद्धा सरकली नाही,
आंदोलने तेंव्हापण झाली 
नंतर कुणी फिरकलं नाही,
तरीही वाटतं  जीवनाची आज सकाळ आहे
सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे.

थरथरत्या हाताला धरून म्हातारीला उभं केलं 
निकाल ऐकण्यासाठी चार भिंतींच्या आत नेलं 
निकाल ऐकुण म्हातारीचे पाय लटपटू लागले 
पुराव्या अभावी निम्मे आरोपी निर्दोष सुटले 
ज्यांना शिक्षा झाली ते तर कधीच मरून गेले 

सत्तर वर्षाच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे 
सतराव्या वर्षी झालेल्या बालात्कारावर 
न्यायालयाचा हा अजून एक बलात्कार आहे.

                                    - कवी प्रकाश पाठारे. 

Sunday, 16 December 2012

" नादब्रम्ह "



पटत नाही मनाला, कि आजही अशी माणसे आहेत कि ज्यांच्यामुळे आपण साक्षात ईश्वराला भेटू शकतो. खरंच संगीतात इतकी जादू असते कि आपण कधी त्यात तल्लीन होऊन जातो हेच कळत नाही. " नादब्रम्ह " काय असतं हे आज उमगल. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव यात आज संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा याचं वादन ऐकत असताना जणू ईश्वर आपल्याला भेटल्याचा आनंद होतो. आणि याच ईश्वराबरोबर बोलण्यात किंवा आपल्या भावना त्या ईश्वरापर्यंत पोहोचवण्यात संगीतात खूप ताकद असते. आजकाल मंदिरातहि जाऊन जी मनःशांती मिळत नाही ती या महोत्सवात मिळाली. जिथे रसिक आणि संगीतांचे देव यांचे मिलन होते. ज्या प्रकारे पंडितजी रसिकांना आपल्या वादनात तल्लीन ठेवतात आणि जसजसा संगीताचा स्वर वाढत जातो तसतशी ईश्वराला भेटण्याची त्यात गुंग होण्याची चढाओढ होत राहते.
     खरं तर संज्ञापनाची पदवी घेत असतांना संज्ञापन, जनसंज्ञापन काय आणि कसं असतं हे शिकलो. पण बोधनशास्त्रानुसार पंडितजींच वादन ऐकत असताना अस जाणवलं कि संज्ञापन किंवा जनसंज्ञापन हे या मार्गाने खूप उत्तम प्रकारे होऊ शकते. 
     मला संगीतातलं फारस कळत नाही. पण ज्या प्रकारे आपण ते मन लावून  ऎकतो तसा त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. कितीतरी वेळाचे मनन, चिंतन केल्याचे फायदे एकत्र एकाच वेळी होतात. आज ज्याप्रकारे तरुण पिढी D.J. च्या तालावर नाचत भरकटत चालली आहे. अश्या तरुणांना ह्या महोत्सवाद्वारे आत्मशुद्धी करून घेण्याची हि एक चांगली संधी होती.  

Sunday, 2 December 2012

माझे विचार, माझे लेखन...

मित्रांनो जर तुम्हाला माझे विचार, माझे लेखन वाचायचे असतील . तसेच त्यावर आपला अभिप्राय नोंदवायचा असेल किंवा एखादी टिपण्णी करायची असेल तर मला http://rohitbhise.blogspot.in/ या blog  वरती follow करा. ( यासाठी मला marks सुद्धा आहेत बरं का)

Please
http://rohitbhise.blogspot.in

पुन्हा लिखाणाला प्रारंभ......

अस वाटत कि बहुतेक  या थंडीच्या दिवसात माझे विचार गोठले का शब्द गारठले हेच काळात नाही. मनात खूप काही असत पण ते व्यक्त करता येत नाही. एखादा चांगला मार्ग मिळावा आपले विचार प्रकट होण्यासाठी, एक सुरुवात हवी आहे. एक सुरुवात जी करेल माझे मत व्यक्त या लिखित मार्गाने. खूप झालं  निश्चय करून. आता प्रारंभ करायला हवा नव्याने, पुन्हा त्याच जोमाने कामाला लागायला हवे. थोडं थोडं का होईना लिहिलं गेल पाहिजे. यासाठी आजपासूनच लिखाणाला सुरुवात करतो आहे. आज माझा पुन्हा लिखाणाला प्रारंभ......

Wednesday, 12 September 2012

विद्यार्थ्यांचे विद्यापीठात मागण्यांसाठी आंदोलन
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, September 12, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे - विद्यापीठातील रिफेक्‍टरीचे खासगीकरण रद्द करण्यात यावे, वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थिनींना वेळेचे बंधन घालू नये, तसेच जयकर ग्रंथालयातील अभ्यासिकेचा दुसरा मजला सुरू करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडन्ट असोसिएशन या विद्यार्थी संघटनेने मंगळवारी आंदोलन केले.

रिफेक्‍टरीबरोबरच विद्यापीठातील विविध उपाहारगृहातील अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने लक्ष घालावे, विद्यापीठात इंटरनेट सुविधा (वायफाय) तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. विद्यार्थ्यांनी जयकर ग्रंथालयापासून मुख्य इमारतीपर्यंत मोर्चा काढला. या वेळी कुलसचिव डॉ. सी. एम. चितळे, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजीव सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. जयकर ग्रंथालयापासून निघालेला मोर्चा मुख्य इमारतीसमोर आल्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. उपहारगृहचालकांकडून मनमानी पद्धतीने दर आकारले जातात, अरेरावीची भाषा वापरली जाते, अशा तक्रारी या वेळी करण्यात आल्या.

प्रशासनाचा निषेध म्हणून या विद्यार्थ्यांनी आज काळ्या फिती लावून आंदोलन केले. रिफेक्‍टरीसह सर्व मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

विद्यापीठातील रिफेक्‍टरी खासगी कंत्राटदाराला चालविण्यासाठी देण्यास विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. विद्यापीठानेच रिफेक्‍टरी चालवावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यापूर्वी विद्यापीठामार्फत रिफेक्‍टरी चालविण्यात येत असे. मात्र सुमारे आठ वर्षांपूर्वी विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यापीठाऐवजी खासगी ठेकेदाराकडे रिफेक्‍टरी चालविण्यासाठी देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांसाठी समन्वयक
विद्यार्थ्यांच्या विविध समस्या समजावून घेत प्रशासनाशी संवाद साधून विद्यार्थ्यांचे योग्य ते प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी समन्वयक म्हणून डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.